Follow My Social Media youtube.com/@hanumantbhopale
www.facebook.com/profile.php?id=100063538068845&am…
२) instgram : @hanumantbhopale
३) Teligram:
t.me/drhanumantbhopale
4) SUBSCRIBE : youtube.com/@hanumantbhopale
5) Mobile No : 9767704606
This channel is full of motivational videos.
Study methods, counselling, motivation, parasonality development, poem, positive thoughts
प्रेरणादायी विचार, व्यक्तिमत्त्वविकास
डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे
Dr. Bhopale Hanumant Marotirao
hmbhopale@gmail.com
youtube.com/@hanumantbhopale
Hanumant Bhopale
How I Used to Study So That What I Read Stayed in My Memory and I Could Write Well in Exams
— Prof. Dr. Hanumant Marotirao Bhopale
Dear Students,
Many students ask me, “Sir, how did you study so that you could remember what you read and write it properly in exams?”
As a student, I did not believe that studying meant simply reading a book repeatedly. My method was simple:
Read → Understand → Ask questions → Make notes → Close the book and recall → Discuss → Teach others → Practise writing → Find mistakes → Revise.
I used to read lessons before they were taught in class, clear my doubts with teachers, prepare question-answer notes, use memory aids, recall answers without looking at the book, revise while walking, record important answers in my own voice, discuss topics with friends, teach them to others, and solve previous question papers within the given time.
Before writing an answer, I would mentally organize its introduction, main points, examples and conclusion. For me, an examination was not something to fear—it was an opportunity to test my preparation.
This approach helped me secure 3rd rank in the M.A. Marathi university merit list and later clear the NET examination on my first attempt.
Students, don’t ask only:
“How many hours did I study?”
Also ask:
“How much did I understand?”
“How much do I remember?”
“How much can I write properly in the exam?”
Don’t let what you read remain only in the book. Bring it into your mind, strengthen it through recall, and express it confidently in your answer sheet.
You will succeed. My heartfelt best wishes to you!
— Prof. Dr. Hanumant Marotirao Bhopale
1 week ago (edited) | [YT] | 0
View 1 reply
Hanumant Bhopale
खरंच आपलं काहीच चुकत नाही?
हनुमंत भोपाळे
— आत्मपरीक्षण करा; खंत बाळगत बसू नका, बोध घ्या आणि सुधारणा करत पुढे चला!
मित्रहो,
खरंच आपलं काहीच चुकत नाही?
ठीक आहे.
त्याचं सगळं चुकतंय.
तिचं सगळं चुकतंय.
त्यांचं सगळं चुकतंय.
पण तुमचं?
एक टक्काही चुकत नाही?
अर्धा टक्काही नाही?
आयुष्यात एकदाही काही चुकलं नाही?
आज काहीच चुकत नाही?
आणि पुढेही काही चुकणार नाही?
आपण शंभर टक्के धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि प्रत्येक वेळी शंभर टक्के बरोबरच आहोत?
आता तुमचं मन काय म्हणतंय, ते तुम्हाला माहीत.
मला एवढंच म्हणायचं आहे—
स्वतःकडेही थोडं संतुलित आणि सकारात्मक नजरेने पाहायला शिका.
कचरा फक्त दुसऱ्याच्याच घरात होतो का?
आपण रोज घर स्वच्छ करतो.
का?
कारण पुन्हा थोडाफार कचरा होतोच.
मग आपण असं म्हणतो का—
“कचरा फक्त दुसऱ्याच्या घरात होतो; माझ्या घरात होतच नाही!”
नाही ना?
मग आपल्या विचारांच्या आणि वर्तनाच्या बाबतीत आपण असा दावा कसा करू शकतो?
दुसऱ्यांच्या स्वभावात दोष असू शकतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात चुका असू शकतात. पण आपल्या विचारांत, शब्दांत आणि कृतीत काहीच सुधारण्यासारखं नाही, असं कसं म्हणता येईल?
घराची जशी नित्य स्वच्छता आवश्यक असते, तशीच मनाची आणि वर्तनाचीही नित्य सुधारणा आवश्यक असते.
जनातही आणि मनातही!
आरसा चेहरा खराब करत नाही
पोरांनो,
आरशात पाहिलं आणि चेहऱ्यावर काही लागलेलं दिसलं, तर आपण आरशावर रागावतो का?
“तू माझा चेहरा खराब दाखवलास!” म्हणून आरसा फोडतो का?
नाही.
आरशाने आपला चेहरा खराब केलेला नसतो. त्याने फक्त आपल्याला वास्तव दाखवलेलं असतं.
आत्मपरीक्षण हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे.
तो आपल्याला कमी लेखण्यासाठी नाही; कुठे सुधारण्याची गरज आहे हे दाखवण्यासाठी आहे.
म्हणून कधीतरी स्वतःच स्वतःचा आरसा व्हा.
स्वतःला विचारा—
“माझ्या बोलण्यामुळे कुणाला त्रास तर होत नाही ना?”
“माझ्या एखाद्या सवयीमुळे माझंच नुकसान तर होत नाही ना?”
“मी दुसऱ्यांकडून ज्या वागण्याची अपेक्षा करतो, तसंच मी त्यांच्याशी वागतो का?”
“माझ्यात काय बदल झाला तर मी कालपेक्षा आज अधिक चांगला होईन?”
या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्याला सांगायची गरज नाही.
स्वतःला मात्र प्रामाणिकपणे द्या.
‘माझं चुकलं’ म्हणण्याची हिंमत ठेवा
चूक मान्य करणं म्हणजे पराभव नाही.
उलट—
“हो, या ठिकाणी माझं चुकलं” असं प्रामाणिकपणे म्हणता येणं हे मानसिक सामर्थ्याचं लक्षण आहे.
काही माणसं आपली चूक सिद्ध होऊ नये म्हणून किती शक्ती खर्च करतात!
स्पष्टीकरण देतात.
कारणं सांगतात.
दुसऱ्यावर दोष ढकलतात.
कधी खोटंही बोलतात.
एवढं सगळं करण्यापेक्षा तीच शक्ती चूक सुधारण्यासाठी वापरली तर?
म्हणून—
चूक लपवण्यासाठी शक्ती खर्च करण्यापेक्षा ती सुधारण्यासाठी शक्ती वापरा.
सत्य स्वीकारण्याने माणूस लहान होत नाही.
कारण सत्यात सामर्थ्य असतं.
‘माझ्याकडून चूक झाली’ आणि ‘मीच वाईट आहे’ यात फरक आहे
हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
एखाद्या परीक्षेत अपयश आलं म्हणजे तुम्ही कायमचे अपयशी ठरत नाही.
एखादा निर्णय चुकला म्हणजे तुमचे सगळेच निर्णय चुकीचे असतात असं नाही.
तुमच्याकडून एखादी चूक झाली म्हणजे तुम्हीच वाईट माणूस आहात, असाही त्याचा अर्थ नाही.
म्हणून स्वतःला दोष देत बसण्याऐवजी काय चुकलं ते तपासा.
व्यक्तीला नाही; कृतीला तपासा.
“मीच वाईट आहे” म्हणण्यापेक्षा—
“माझ्याकडून हे चुकलं; आता ते कसं सुधारता येईल?”
हा प्रश्न अधिक उपयोगाचा आहे.
आत्मपरीक्षण म्हणजे आत्मनिंदा नव्हे
आत्मपरीक्षण करताना आणखी एक चूक करू नका.
फक्त आपल्यात काय वाईट आहे, काय चुकतंय, काय कमी आहे, एवढंच शोधत बसायचं नाही.
आपल्यात जे चांगलं आहे तेही ओळखायचं.
जे योग्य चाललं आहे ते टिकवायचं.
जिथे कमतरता आहे तिथे सुधारणा करायची.
आत्मपरीक्षणाचं रूपांतर आत्मनिंदेत होऊ देऊ नका.
स्वतःला सतत दोष देणं म्हणजे सुधारणा नाही.
स्वतःला समजून घेऊन आवश्यक बदल करणं म्हणजे सुधारणा.
प्रत्येक टीका खरीच असेल असंही नाही
कुणीतरी आपली चूक दाखवली म्हणून लगेच—
“हो, माझंच सगळं चुकतंय!”
असंही म्हणायचं नाही.
आणि—
“तो कोण मला सांगणारा?”
असं म्हणून प्रत्येक सूचना फेटाळायचीही नाही.
संतुलित विचार करा.
स्वतःला विचारा—
“समोरचा जे सांगतोय, त्यात काही तथ्य आहे का?”
असेल तर स्वीकारा.
त्यातून काही सुधारता येत असेल तर सुधारा.
आणि तथ्यच नसेल तर ते मनावर घेऊन स्वतःला त्रास देत बसू नका.
सत्य स्वीकारण्याची तयारी आणि असत्य सोडून देण्याची ताकद—दोन्ही आवश्यक आहेत.
माफी शब्दांतच नाही; वागण्यातही दिसली पाहिजे
आपल्यामुळे कुणाला त्रास झाला असेल, कुणाचं मन दुखावलं असेल आणि आपली चूक लक्षात आली असेल तर—
“माझं चुकलं. मला माफ करा.”
एवढं म्हणायला कमीपणा कशाला वाटावा?
कधी हे चार शब्द तुटणारं नातं वाचवू शकतात.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा.
आज माफी मागायची आणि उद्या पुन्हा तीच चूक करायची, याला किती अर्थ आहे?
खरी माफी शब्दांत कमी आणि पुढच्या वागण्यात अधिक दिसली पाहिजे.
माफी मागितल्यानंतर वर्तनात बदल झाला, तर त्या माफीला अर्थ प्राप्त होतो.
माफ करता आलं तर मन साफ राहील
जगताना फक्त आपणच चुकतो असं नाही.
समोरचाही चुकतो.
त्याने केलेली प्रत्येक चूक आयुष्यभर मनात साठवून ठेवायची का?
राग, द्वेष, सूड, जुन्या घटना—हे सगळं मनात साठवत गेलो तर त्याचं ओझं कोण वाहणार?
आपणच ना?
म्हणून शक्य असेल तिथे क्षमा करायला शिका.
याचा अर्थ प्रत्येक चुकीचं समर्थन करा असा नाही. आवश्यक तिथे भूमिका घ्या, मर्यादा ठेवा, अंतरही ठेवा; पण जुन्या वेदनेला कायम मनात घर करून देऊ नका.
माफ करता आलं तर स्वतःचं मन साफ राहायला मदत होते; आणि मन साफ असेल तर आनंदाला तिथे जागा मिळते.
आता त्या मनात आनंद नांदू द्यायचा की सतत राग-द्वेषाचा कचरा साठवत राहायचा—
हे कोण ठरवणार आहे, पोरांनो?
तुम्हीच ना?
खंत नाही; बोध हवा
आता तुम्ही म्हणाल—
“सर, मग माझ्याकडून आजपर्यंत जे काही चुकलं त्याचं काय?”
त्याची खंत बाळगत बसा, असं मी अजिबात म्हणत नाही.
चूक झाली?
ठीक आहे.
ती का झाली ते समजून घ्या.
त्यातून बोध घ्या.
जे सुधारता येईल ते सुधारा.
आणि पुढे चला.
कारण चुकांची खंत करत बसल्याने भूतकाळ बदलत नाही.
उलट वर्तमान हातातून निघून जातं.
खंत बाळगत बसण्यापेक्षा बोध घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
बोध घेतला तर सुधारणा होईल.
सुधारणा झाली तर प्रगती होईल.
पण खंतच बाळगत बसलो, तर आयुष्याचं खत होत जाईल!
त्याला काही अर्थ आहे का?
नाही ना?
अर्थ नसणाऱ्या गोष्टींमध्ये आयुष्य गुंतवत राहिलो, तर अर्थपूर्ण आयुष्यही हळूहळू निरर्थक होत जातं.
वर्तमान सुधारा; भविष्य उज्ज्वल करा
भूतकाळात काय चुकलं याचा बोध घ्या; पण वर्तमानात काय चुकत आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे.
कारण वर्तमानातील चुका सुधारत गेलो तर भविष्य बदलू शकतं.
बोलण्यात सुधारणा झाली तर नाती सुधारू शकतात.
सवयी सुधारल्या तर व्यक्तिमत्त्व घडू शकतं.
अभ्यासाची पद्धत सुधारली तर निकाल बदलू शकतो.
विचार सुधारले तर निर्णय अधिक चांगले होऊ शकतात.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
दुसरा कुठे चुकतोय हे शोधताना कधीतरी स्वतःलाही विचारा—
“माझ्याकडून काय चुकतंय?”
“मला कुठे सुधारता येईल?”
“कालपेक्षा आज मी थोडा चांगला कसा होऊ शकतो?”
हे प्रश्न स्वतःला कमी लेखण्यासाठी नाहीत.
स्वतःला अधिक चांगलं घडवण्यासाठी आहेत.
दररोज एक टक्का सुधारणा झाली नाही तरी हरकत नाही; पण शक्य तेवढी छोटी सुधारणा करण्याची तयारी तरी असू द्या.
कारण माणूस एका दिवसात परिपूर्ण होत नाही.
तो स्वतःला पाहत राहतो, शिकत राहतो, बदलत राहतो आणि हळूहळू अधिक चांगला होत जातो.
चार शब्द लक्षात ठेवा
आणि म्हणून पोरांनो,
आयुष्यात प्रत्येक वेळी कोण बरोबर आणि कोण चूक याचाच हिशेब करत बसण्यापेक्षा स्वतःच्या वाटचालीसाठी हे चार शब्द लक्षात ठेवा—
क्षमा — बोध — सुधारणा — प्रगती
जिथे शक्य आहे तिथे क्षमा करा.
जे घडलं त्यातून बोध घ्या.
जे चुकत आहे त्यात सुधारणा करा.
आणि प्रगतीच्या दिशेने पुढे चालत राहा.
दुसऱ्याला सुधारण्याची सुरुवात त्याच्यापासून होईल की नाही, हे आपल्या हातात नाही.
पण—
स्वतःच्या सुधारणेची सुरुवात स्वतःपासून आजच करता येते.
आत्मपरीक्षण करा; पण आत्मनिंदा करू नका.
चूक स्वीकारा; पण अपराधीपणात अडकू नका.
माफ करा; पण अनुभवातून शहाणे व्हा.
बोध घ्या आणि पुढे चला.
कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या आपण थोडं अधिक चांगलं बनत गेलो, तरी तीही मोठी प्रगती आहे.
तुमच्या या वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
YouTube : Hanumant Bhopale
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
‘कुणीतरी मला समजून घ्यावे’ ही अपेक्षा बाळगत बसण्यापेक्षा आपण इतरांना समजून घेत वाटचाल केली, तर ती अधिक फायदेशीर ठरते. इतरांशी तुलना करत जगण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जाणे अधिक महत्त्वाचे आहे. अंतःकरणातील प्रेरणेचा दिवा तेवत ठेवून वाटचाल करा; कारण जीवनातील प्रगतीसाठी अंतःप्रेरणा अत्यंत आवश्यक असते.
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Hanumant Bhopale
‘मानससूत्र’ ग्रंथाविषयी एक आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील ताणतणाव, चिंता, निराशा, अपयशाची भीती, नातेसंबंधातील गुंतागुंत, एकटेपणा, भावनिक अस्वस्थता, आत्मविश्वासाचा अभाव अशा विविध प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि त्यांना सकारात्मक जीवनदृष्टी देणे ही आजच्या काळाची गरज आहे.
या उपक्रमाच्या उद्देशाला आपल्या परीने पूरक ठरावे, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक, पालक आणि समुपदेशकांच्या हातात सहज वापरता येतील अशी काही ‘मानससूत्रे’ असावीत, या भूमिकेतून समुपदेशक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांचा ‘मानससूत्र’ हा ग्रंथ प्रकाशनासाठी सिद्ध होत आहे.
हा ग्रंथ केवळ समस्यांची चर्चा करणारा न राहता विद्यार्थ्यांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, नकारात्मक विचारांमधून बाहेर पडण्यास मदत करणे, अपयश पचविणे, टीका हाताळणे, भूतकाळातील वेदनांतून बाहेर येणे, आत्मविश्वास वाढविणे, मनातील प्रेरणेचा दिवा जागा ठेवणे आणि पुन्हा ध्येयनिष्ठ वाटचाल करणे अशा विविध अंगांनी उपयुक्त ठरावा, असा लेखकाचा प्रयत्न आहे.
या ग्रंथासंदर्भात शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशक, मानसशास्त्राचे अभ्यासक, पालक आणि विद्यार्थी यांच्या काही सूचना असतील, एखादा महत्त्वाचा विषय ग्रंथात समाविष्ट करावा असे वाटत असेल किंवा विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक जीवनाशी संबंधित काही प्रश्न असतील, तर तेही जरूर कळवावेत.
आपण पाठविलेल्या प्रश्नांमुळे आणि सूचनांमुळे या ग्रंथाला अधिक व्यापक, वास्तवस्पर्शी आणि उपयुक्त स्वरूप देता येईल.
आपले प्रश्न आणि सूचना जरूर कळवा...
संपर्क :
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
मोबाईल : 9767704604
ई-मेल : hanumantbhopale@gmail.com
YouTube : Hanumant Bhopale
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Hanumant Bhopale
आधी मनाला स्थिर करा; मग ध्येयनिष्ठ कृती आणि उक्तीला प्राधान्य द्या!
सध्या अनेक माणसांचं मन अतिशय अस्थिर झालेलं दिसतं. कुठे मन लागायला तयार नाही. जिथे आहे तिथे माणूस राहायला तयार नाही आणि जिथे नाही तिथे गेल्यावर आपण सुखी होऊ, असं त्याला वाटत राहतं.
पण मित्रांनो, मन जाग्यावर नसेल तर कोणतीच परिस्थिती जागेवर येऊ शकणार नाही.
तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, आनंदाने आणि समाधानाने जगायचं असेल, तर सर्वांत आधी मन स्थिर आणि स्वस्थ करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे.
आपल्याला आयुष्यात वेगवेगळी कामं असतात. त्या कामांना प्राधान्यक्रम द्यायचा ठरवला, तर माझ्या मते मन स्थिर आणि स्वस्थ करण्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे.
मनच अस्थिर असेल तर पैसा असून उपयोग नाही, पद असून समाधान नाही, माणसं जवळ असून आपलेपणा जाणवत नाही आणि संधी समोर असूनही तिचा योग्य उपयोग करून घेता येत नाही.
म्हणून पहिलं काम — मानसिक स्वास्थ्य.
मनात सतत विचारांची गर्दी असेल, कालच्या गोष्टींची खंत असेल, उद्याची अनावश्यक चिंता असेल, कोणाबद्दल राग-द्वेष असेल, तर वर्तमानातल्या कामावर लक्ष केंद्रित होणार कसं?
मनाला स्वस्थ करण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या हातात आहे त्यावर काम करा. जे आपल्या हातात नाही त्याचा अनावश्यक भार मनावर घेऊ नका.
मन स्थिर झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट — शारीरिक स्वास्थ्य.
शरीर हे आपल्या ध्येयपूर्तीचं साधन आहे. शरीराची साथ नसेल तर मनात कितीही मोठ्या कल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात उतरवताना अडचणी येतात. म्हणून शरीरासाठी वेळ द्या. योग्य आहार, व्यायाम, झोप आणि आवश्यक विश्रांती याकडे लक्ष द्या.
तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट — नातेसंबंध.
इथे ‘नातेसंबंध’ हा शब्द मी केवळ रक्ताच्या नातेवाईकांच्या अर्थाने वापरत नाही. आपला ज्याच्या-ज्याच्याशी संबंध येतो, ते सर्वजण मला अभिप्रेत आहेत. कुटुंब, मित्र, शेजारी, सहकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील इतर माणसंही त्यात आली.
संबंध बिघडले की स्वास्थ्यही बिघडतं, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.
नातेसंबंध सकारात्मक कसे ठेवता येतील यासाठी आपल्या बाजूने प्रयत्न करावेत. गैरसमज असतील तर दूर करावेत. आपली चूक असेल तर मान्य करावी. संवादाने प्रश्न सुटत असेल तर संवाद साधावा.
पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते.
समोरचा ऐकायलाच तयार नसेल, आपल्याशी त्याला काही देणंघेणं नसेल, आपण कितीही प्रयत्न केले तरी संबंध सुधारत नसतील, तर त्याचा राग आणि द्वेष मनात घेऊन आपण किती दिवस फिरणार?
अशा वेळी एवढाच विचार करावा —
‘परमेश्वरा, यांना माफ कर. हे काय करत आहेत, हे त्यांना कळत नाही.’
आणि आपण सकारात्मक वाटचाल करावी.
जे सोबत येतील त्यांच्यासह चालावं. जे येणार नाहीत त्यांना शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्याबद्दल सद्भावना ठेवावी आणि आपलं जीवन जगावं.
मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि नातेसंबंधांनंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे — आर्थिक विकास.
आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी बचतीची सवय महत्त्वाची आहे. आपल्याकडे जे काही संचित आहे त्याचा सदुपयोग करण्यावर भर दिला पाहिजे.
पण बचत करा याचा अर्थ पोटाला खाऊ नका, अंगाला कपडा घालू नका, पायाला चप्पल घालू नका, असा नाही.
केवळ दाखवण्यासाठी पैसे खर्च करू नका.
पैसे खर्च करताना स्वतःला विचारा —
‘हे करणं खरंच गरजेचं आहे का?’
दुसऱ्याकडे आहे म्हणून आपल्याकडेही असावं, ही झाली इच्छा. आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा आपल्या कामासाठी खरोखर आवश्यक आहे, ती झाली गरज.
‘Want’ आणि ‘Need’ यातला फरक कळला पाहिजे.
मित्रांनो, जीवन जगताना आपल्याला अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. वेगवेगळ्या क्षेत्रांत जावंसं वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रांत यश हवं वाटतं.
पण एकाच वेळी सगळं होत नाही.
हे लक्षात आल्यानंतर ज्या क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो, त्या क्षेत्रावर फोकस केला पाहिजे. त्या क्षेत्रासंबंधी ध्येय ठरवलं पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी आवश्यक साधनं गोळा करून साधना सुरू केली पाहिजे.
कारण —
साधना खंडित झाली, अखंडित राहिली नाही, की ध्येयाचं खंडन व्हायला वेळ लागत नाही.
ध्येयाचे खंडन झाले की यशाचेही तुकडे झाले समजावे.
अपयशी जीवन जगणं वाट्याला येत राहिलं की त्याच्याही वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात.
म्हणून मला वाटतं —
अपयशाच्या वेदनांपेक्षा ध्येयप्राप्तीच्या वेदना परवडल्या मित्रांनो!
ध्येय प्राप्त करताना जखमा होतील. थकवा येईल. अडचणी येतील. कधी मदत मिळणार नाही. कधी परिस्थिती आपल्या बाजूने नसेल.
पण त्या जखमांना एक अर्थ असतो.
ध्येयपूर्ती झाल्यानंतर त्या जखमा बऱ्या होऊन जातात आणि आयुष्यभर त्या जखमांच्या आठवणी आनंदाने मिरवता येतात.
मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. झालो. गुणवत्ता यादीत आलो. NET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो.
हे सगळं करत असताना माझ्या पायाच्या घोट्याला बसून-बसून घट्टे पडले होते.
त्या वेळी वेदना झाल्या. पण आज त्या वेदनांची आठवण झाली तर समाधान वाटतं. कारण त्या वेदनांच्या पाठीमागे माझं ध्येय होतं.
म्हणून मित्रांनो,
आधी मनाला स्थिर करा.
शरीर स्वस्थ ठेवा.
नातेसंबंध सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
आर्थिक शिस्त लावा.
आपलं ध्येय निश्चित करा.
आणि मग ध्येयनिष्ठ कृती आणि उक्तीला प्राधान्य द्या.
मन एकीकडे, बोलणं दुसरीकडे आणि कृती तिसरीकडे असली तर माणसाची ऊर्जा विखुरते. मन, उक्ती आणि कृती एकाच ध्येयाच्या दिशेने गेली की माणसाची ताकद वाढते.
मन रोज बदललं तर दिशा रोज बदलेल. दिशा रोज बदलली तर मुक्काम गाठता येणार नाही.
एक दिशा ठरवा आणि चालत राहा.
कामावर स्वार झाल्याशिवाय यशावर स्वार होता येत नाही!
काम न केल्याच्याही वेदना आहेत आणि काम केल्याच्याही वेदना आहेत. पण काम न केल्याच्या वेदना पुढे पश्चात्ताप देतात; काम करताना झालेल्या वेदना मात्र एक दिवस यश आणि समाधान देऊ शकतात.
म्हणून काम करा.
ध्येयनिष्ठ कृती करा.
ध्येयाला बळ देणारी उक्ती करा.
कष्ट करा.
त्या वेदना परवडतील मित्रांनो!
कारण आज ध्येयासाठी सहन केलेल्या वेदना उद्या समाधानाच्या आठवणी होऊ शकतात.
एवढंच सांगतो.
थांबतो.
धन्यवाद!
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
YouTube : Hanumant Bhopale
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
प्राध्यापक भरतीत CCTV स्वागतार्ह; पण एवढ्यानेच पारदर्शकता येईल का?
हनुमंत भोपाळे
निवड समितीच्या नियुक्तीपासून प्रत्यक्ष अध्यापन प्रात्यक्षिकापर्यंत संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष हवी!
लवकरच प्राध्यापक भरती होणार आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे, मुलाखत प्रक्रियेचे CCTV रेकॉर्डिंग करणे तसेच अंतिम निवड यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे यांसारखी पावले निश्चितच स्वागतार्ह आहेत.
उच्च शिक्षणातील प्राध्यापक भरतीबाबत उमेदवारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे.
मित्र हो,मात्र माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो—
‘फक्त मुलाखतीचं CCTV रेकॉर्डिंग केल्याने निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईल का?’
कॅमेरा मुलाखतीच्या खोलीत काय घडलं ते दाखवू शकतो; पण मुलाखतीपूर्वी काय घडलं, हे प्रत्येक वेळी त्यातून कळेलच असं नाही.
पूर्वनियोजनाची शक्यता कशी रोखणार?
समजा एखाद्या उमेदवाराला निवडण्याचं पूर्वनियोजन असेल आणि निवड समितीतील तज्ज्ञ कोण असणार, याची माहिती संबंधितांना अगोदरच मिळाली तर संभाव्य संपर्क किंवा प्रभावाची शक्यता नाकारता येईल का?
विशिष्ट उमेदवाराच्या सोयीचे प्रश्न विचारले गेले किंवा त्याला अपेक्षित प्रश्नांची पूर्वकल्पना मिळाली, तर तो कॅमेऱ्यासमोर उत्तम उत्तरं देऊ शकतो.
रेकॉर्डिंगमध्ये दिसेल—
प्रश्न विचारला.
उमेदवाराने योग्य उत्तर दिलं.
गुण मिळाले.
निवड झाली.
कागदोपत्री आणि कॅमेऱ्यासमोर प्रक्रिया व्यवस्थित दिसू शकते.
म्हणून पारदर्शकतेची व्याख्या केवळ ‘रेकॉर्डिंग’पुरती मर्यादित न ठेवता पूर्वनियोजन आणि संभाव्य हस्तक्षेपाला कमीत कमी वाव देणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
याचा अर्थ प्रत्येक संस्था, संस्थाचालक किंवा निवड समितीवर संशय घेणं असा अजिबात नाही. अनेक संस्था अत्यंत प्रामाणिकपणे गुणवत्तेच्या आधारे भरती करतात.
उलट व्यवस्था इतकी सक्षम असली पाहिजे की प्रामाणिक संस्थांवर संशय घेण्याचं कारणच उरू नये आणि गैरप्रकार करू इच्छिणाऱ्यांसाठी पळवाटा कमीत कमी राहाव्यात.
निवड समितीतील तज्ज्ञांची निवड यादृच्छिक पद्धतीने करा
प्रत्येक विषयासाठी पात्र तज्ज्ञांचं मोठं पॅनेल संबंधित विद्यापीठाकडे असावं.
त्यातून मुलाखतीसाठी आवश्यक बाह्य विषयतज्ज्ञांची निवड संगणकीय यादृच्छिक पद्धतीने करण्याचा विचार व्हावा.
कोणत्या महाविद्यालयासाठी नेमके कोणते तज्ज्ञ जाणार आहेत, ही माहिती शक्य तितक्या उशिरापर्यंत गोपनीय ठेवता येईल.
तज्ज्ञ निवडीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात नोंदवली जावी.
म्हणजे नंतर प्रश्न उपस्थित झाला तर—
तज्ज्ञाची निवड कधी झाली?
कोणत्या पॅनेलमधून झाली?
कोणत्या प्रक्रियेने झाली?
याची पडताळणी करता येईल.
पारदर्शकतेसोबत ‘डिजिटल ऑडिट ट्रेल’ही हवा.
तज्ज्ञांची नावं शेवटपर्यंत गोपनीय का ठेवू नयेत?
अधिक सक्षम व्यवस्था निर्माण करायची असेल तर निवड समितीतील बाह्य तज्ज्ञांना प्रथम संबंधित विद्यापीठाच्या निश्चित केंद्रावर बोलावता येईल.
तिथे उपस्थित झाल्यानंतरच त्यांना मुलाखतीच्या ठिकाणाची अंतिम माहिती देण्याची व्यवस्था करता येईल.
विद्यापीठाच्या व्यवस्थेतून त्यांना संबंधित मुलाखत केंद्रावर पाठवता येईल.
या संवेदनशील कालावधीत अनावश्यक बाह्य संपर्क कमी करण्यासाठी मोबाईल किंवा अन्य संपर्क साधनांच्या वापराबाबत कायदेशीर, गोपनीयता आणि आपत्कालीन गरजांचा विचार करून योग्य प्रोटोकॉल तयार करता येईल.
उद्देश तज्ज्ञांवर संशय घेण्याचा नाही.
उद्देश तज्ज्ञांना कोणत्याही संभाव्य बाह्य प्रभावापासून दूर ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देण्याचा आहे.
पण सर्वांत महत्त्वाचा प्रश्न—फक्त मुलाखत का?
आपण निवड कुणाची करत आहोत?
प्राध्यापकाची!
मग प्राध्यापकाची प्रत्यक्ष अध्यापनक्षमता तपासल्याशिवाय केवळ मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड का व्हावी?
एखादा उमेदवार प्रश्नांची उत्तम उत्तरं देऊ शकतो.
त्याचं विषयज्ञान उत्तम असू शकतं.
पण विद्यार्थ्यांसमोर उभं राहून तो विषय सोप्या, नेमक्या आणि परिणामकारक पद्धतीने शिकवू शकतो का?
विद्यार्थ्यांना विषय समजतो का?
त्यांच्याशी संवाद साधता येतो का?
अवघड संकल्पना सोपी करून सांगता येते का?
हे प्रत्यक्ष अध्यापन केल्याशिवाय कसं कळणार?
‘चांगलं उत्तर देणं’ आणि ‘चांगलं शिकवणं’ या दोन वेगळ्या क्षमता आहेत.
‘Teaching Demo’ अनिवार्य करा!
सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये प्रत्येक पात्र उमेदवाराचं प्रत्यक्ष अध्यापन प्रात्यक्षिक—Teaching Demo—अनिवार्य करण्याचा विचार शासनाने करावा.
उमेदवाराला निर्धारित विषयावर साधारण १५ ते २० मिनिटांचं अध्यापन करण्याची संधी द्यावी.
शक्य असल्यास हे अध्यापन विद्यार्थ्यांसमोर किंवा प्रमाणित शैक्षणिक पॅनेलसमोर व्हावं.
Teaching Demo मध्ये—
विषयज्ञान,
संकल्पनात्मक स्पष्टता,
अध्यापन पद्धती,
विद्यार्थ्यांशी संवाद,
भाषेवरील प्रभुत्व,
उदाहरणांचा वापर,
फळा किंवा डिजिटल साधनांचा उपयोग,
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद,
आणि एकूण अध्यापन परिणामकारकता
यांचं पूर्वनिर्धारित निकषांनुसार स्वतंत्र गुणांकन व्हावं.
कारण प्राध्यापकाची खरी परीक्षा शेवटी वर्गातच होते!
Teaching Demo चेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा
मुलाखतीप्रमाणेच प्रत्येक उमेदवाराच्या Teaching Demo चंही संपूर्ण ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं.
त्यामुळे एखाद्या उमेदवाराला Teaching Demo मध्ये कमी किंवा जास्त गुण का मिळाले, याचं आवश्यकतेनुसार पुनरावलोकन करता येईल.
उमेदवाराची संमती, गोपनीयता आणि लागू कायदेशीर तरतुदींचा विचार करून हे रेकॉर्डिंग संबंधित विद्यापीठाच्या अधिकृत भरती पोर्टलवर निश्चित कालावधीसाठी उपलब्ध करण्याची व्यवहार्यता तपासता येईल.
सार्वजनिकरीत्या उपलब्ध करणं कायदेशीरदृष्ट्या किंवा गोपनीयतेच्या दृष्टीने शक्य नसेल, तर किमान संबंधित उमेदवार, विद्यापीठ आणि अधिकृत तक्रार निवारण किंवा पुनरावलोकन यंत्रणेला ते उपलब्ध असावं.
पाठ केलेली उत्तरं आणि प्रत्यक्ष अध्यापन यात फरक आहे!
मुलाखतीतील संभाव्य प्रश्नांची तयारी करून चांगली उत्तरं देता येतात.
पण विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष उभं राहिल्यानंतर उमेदवाराची अध्यापनक्षमता अधिक स्पष्टपणे समोर येते.
म्हणून—
‘प्राध्यापक निवडायचा असेल, तर तो केवळ बोलतो कसा हे पाहू नका; तो शिकवतो कसा हेही पाहा!’
आणखी एका वाक्यात सांगायचं तर—
‘मुलाखत कॅमेऱ्यासमोर आणि अध्यापन विद्यार्थ्यांसमोर—दोन्हींच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनातून प्राध्यापक निवडा!’
एकाच मुलाखतीवर उमेदवाराचं भविष्य ठरू नये
प्राध्यापकाची गुणवत्ता बहुआयामी असते.
त्यामुळे अंतिम निवडीत लागू नियमांशी सुसंगत आणि पूर्वघोषित निकषांनुसार—
शैक्षणिक गुणवत्ता,
विषयज्ञान,
संशोधन,
अध्यापनाचा अनुभव,
Teaching Demo,
आणि संरचित मुलाखत
यांचा समतोल विचार व्हावा.
एका छोट्या मुलाखतीतील कामगिरीवर उमेदवाराची संपूर्ण अध्यापनक्षमता ठरवणं योग्य ठरणार नाही.
सर्वांना काही समान प्रश्न का विचारू नयेत?
मुलाखत अधिक वस्तुनिष्ठ करण्यासाठी विषयनिहाय मोठी डिजिटल प्रश्नपेढी तयार करण्याचा विचार करता येईल.
त्यातून यादृच्छिक पद्धतीने प्रश्न निवडता येतील.
तसेच प्रत्येक उमेदवाराला काही समान मूलभूत प्रश्न विचारल्यास तुलनात्मक मूल्यमापन अधिक सुसंगत होऊ शकतं.
मात्र प्रश्नोत्तर ही निवडीची एकच बाजू असावी.
Teaching Demo ही दुसरी महत्त्वाची बाजू असावी.
गुण तत्काळ डिजिटल पद्धतीने ‘लॉक’ व्हावेत
मुलाखत आणि Teaching Demo पूर्ण झाल्यानंतर समिती सदस्यांनी दिलेले गुण स्वतंत्रपणे डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवावेत.
एकदा अंतिम केलेले गुण सहज बदलता येऊ नयेत.
अपरिहार्य कारणाने बदल करावा लागल्यास—
कोणी बदल केला?
केव्हा केला?
का केला?
याची डिजिटल नोंद कायम राहावी.
यालाच खऱ्या अर्थाने ‘ऑडिट ट्रेल’ म्हणता येईल.
उमेदवाराला स्वतःचे घटकनिहाय गुण कळले पाहिजेत
केवळ अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून पारदर्शकता पूर्ण होत नाही.
प्रत्येक उमेदवाराला शक्यतो त्याच्या—
शैक्षणिक पात्रतेचे गुण,
अनुभवाचे गुण,
संशोधनाचे गुण,
Teaching Demo चे गुण,
मुलाखतीचे गुण
आणि अंतिम एकूण गुण
उपलब्ध व्हावेत.
निवड न झालेल्या उमेदवारालाही—
‘माझी निवड का झाली नाही?’
याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळालं पाहिजे.
स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा आवश्यक
भरती प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप असल्यास उमेदवाराला केवळ संबंधित संस्थेकडेच दाद मागावी लागू नये.
विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण विभागाच्या स्तरावर स्वतंत्र आणि कालबद्ध तक्रार निवारण व्यवस्था असावी.
गंभीर तक्रार प्राप्त झाल्यास आवश्यकतेनुसार—
CCTV रेकॉर्डिंग,
Teaching Demo चे रेकॉर्डिंग,
गुणपत्रक,
डिजिटल ऑडिट ट्रेल,
शॉर्टलिस्टिंगचे निकष,
तज्ज्ञ निवडीची डिजिटल नोंद
यांची पडताळणी करता आली पाहिजे.
शासनाने या दहा बाबींचा विचार करावा
१. बाह्य विषयतज्ज्ञांची निवड विद्यापीठस्तरीय पॅनेलमधून संगणकीय यादृच्छिक पद्धतीने करावी.
२. अंतिम बाह्य तज्ज्ञांची माहिती शक्य तितक्या उशिरापर्यंत गोपनीय ठेवावी.
३. निवड समितीच्या नियुक्तीपासून अंतिम निकालापर्यंत डिजिटल ‘ऑडिट ट्रेल’ ठेवावा.
४. मुलाखतीबरोबर प्रत्यक्ष Teaching Demo अनिवार्य करण्याचा विचार करावा.
५. Teaching Demo चे संपूर्ण ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे.
६. गोपनीयता व कायदेशीर बाबी तपासून ते रेकॉर्डिंग विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलवर निश्चित कालावधीसाठी उपलब्ध करण्याची व्यवहार्यता तपासावी; किमान अधिकृत पुनरावलोकनासाठी ते उपलब्ध असावे.
७. मुलाखतीसाठी प्रमाणित आणि आवश्यकतेनुसार यादृच्छिक प्रश्नपेढीचा वापर करावा.
८. मुलाखत व Teaching Demo चे गुण तत्काळ डिजिटल पद्धतीने ‘लॉक’ करावेत.
९. प्रत्येक उमेदवाराला त्याचे घटकनिहाय गुण उपलब्ध करून द्यावेत.
१०. गंभीर तक्रारींसाठी विद्यापीठ किंवा शासनस्तरीय स्वतंत्र, कालबद्ध पुनरावलोकन यंत्रणा असावी.
कारण आजचा निवडलेला प्राध्यापक उद्याची पिढी घडवणार आहे!
प्राध्यापक भरती हा केवळ एका उमेदवाराला नोकरी मिळण्याचा प्रश्न नाही.
आज निवड झालेला प्राध्यापक पुढील अनेक वर्षं हजारो विद्यार्थ्यांना शिकवणार आहे.
त्याचं ज्ञान, अध्यापन कौशल्य, संशोधनवृत्ती आणि शैक्षणिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या पिढ्यांवर परिणाम करणार आहे.
म्हणून प्राध्यापक भरतीमध्ये पैसा, ओळख किंवा प्रभावाला वाव मिळणार नाही अशी मजबूत व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे.
पात्रता, गुणवत्ता, विषयज्ञान आणि प्रत्यक्ष अध्यापनक्षमता यांना निर्णायक महत्त्व मिळालं पाहिजे.
शासनाने CCTV रेकॉर्डिंगसारखं सकारात्मक पाऊल उचललं आहे. त्याचं स्वागत करतानाच ही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी निवड समितीच्या गठनापासून अंतिम गुणांकनापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचा विचार व्हायला हवा.
कारण—
‘पारदर्शकता म्हणजे फक्त जे घडलं ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणं नव्हे;
गैरप्रकार घडण्याची शक्यता कमीत कमी करणारी व्यवस्था निर्माण करणं होय!’
आणि प्राध्यापक भरतीचं सूत्र अगदी साधं असायला हवं—
‘प्राध्यापकाची निवड करायची असेल,
तर त्याची केवळ मुलाखत घेऊ नका—
त्याला शिकवायलाही लावा!
कारण प्रश्नाचं उत्तर किती चांगलं देता येतं याबरोबरच
विद्यार्थ्याला विषय किती चांगला शिकवता येतो,
हेही प्राध्यापकासाठी महत्त्वाचं आहे!’
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
YouTube : Hanumant Bhopale
#प्राध्यापकभरती #उच्चशिक्षण #पारदर्शकभरती #TeachingDemo #गुणवत्तापूर्णशिक्षण
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
प्रयोगशील शिक्षक, साहित्यिक मित्र शिवाजीराव अंबुलगेकर
सेवापूर्ती हा कार्याचा पूर्णविराम नव्हे; नव्या साहित्यिक पर्वाचा प्रारंभ!
काही माणसं आपल्या आयुष्यात मौलिक असतात.
त्यांच्या सहवासातून काही प्रेरक आठवणी तयार होतात, काही विचार मिळतात आणि त्यांच्या कामातून आपल्यालाही काहीतरी नवं करण्याची ऊर्जा मिळत राहते.ते आपल्या भाव विश्वाचा भाग बनतात.
असाच एक माणूस म्हणजे श्री शिवाजी तुळशीराम अंबुलगेकर सर.
साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रयोगशील शिक्षक, संवेदनशील साहित्यिक, प्रभावी सूत्रसंचालक, अभ्यासपूर्ण व्याख्याते आणि विद्यार्थ्यांच्या मनावर आपुलकीचं राज्य करणारे अंबुलगेकर सर आज शिक्षक म्हणून शेवटची सही केलेली आहे.
या निमित्ताने त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी मनात जाग्या होत आहेत.
शिक्षक म्हणजे केवळ वर्गात शिकवणारा माणूस नव्हे!
अंबुलगेकर सरांचा शिक्षक म्हणून मला भावलेला गुण म्हणजे त्यांची प्रयोगशीलता.
अध्यापन म्हणजे वर्गात जाऊन पुस्तकातील धडा शिकवायचा, तास संपला की बाहेर यायचं—एवढ्यापुरती त्यांची शिक्षकाची भूमिका मर्यादित नव्हती.
विद्यार्थ्यांपर्यंत विषय अधिक परिणामकारकपणे कसा पोहोचेल, विद्यार्थ्यांना विषयाशी कसं जोडता येईल, त्यांची जिज्ञासा कशी वाढेल याचा ते विचार करत. विचार करूनच थांबत नसत तर काही प्रयोग करत आले आहेत.
प्रसंगी वर्गाच्या चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिकवणं, विद्यार्थ्यांच्या परिचयातील उदाहरणं वापरणं आणि बोलीभाषेच्या सहजतेतून विषय समजावून सांगणं ही त्यांच्या अध्यापनाची वैशिष्ट्यं होती.
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, हे त्यांच्या अध्यापनातून जाणवत राहिलं.
बोलीभाषेशी असलेलं नातं
मराठी भाषा शिकवताना केवळ प्रमाणभाषेपुरतं मर्यादित न राहता बोलीभाषेतील जिवंतपणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी होती.
भाषा ही फक्त पुस्तकात नसते; ती माणसांच्या जगण्यात असते, त्यांच्या बोलण्यात असते, संस्कृतीत असते—ही जाणीव त्यांच्या अध्यापनातून दिसत असे.
त्यामुळे त्यांचा तास केवळ अभ्यासक्रमाचा तास राहत नसे; तो अनेकदा भाषा, साहित्य आणि जीवन यांचा संवाद बनत असे. बोलीभाषेला त्यांनी उजागर केले लोकांसमोर ठेवले आहे.
ते सहजच बोली भाषेतच बोलतात. काही जणांना बोलीत बोलणे
कमीपणाचे वाढते हे खरंतर अज्ञान आहे त्यांचं.
शिवाजीरावांनी बोलीभाषेला आपल्या वाणीतून आणि लेखणीतून जिवंत ठेवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे.
साधनं नाहीत म्हणून थांबायचं नाही. परिस्थिती अनुकूल नाही म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत. उपलब्ध साधनांमधून शक्य ते उत्तम उभं करण्याचा प्रयत्न करायचा.
ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही. त्यांच्या विविध साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून ती वृत्ती दिसून आली.
सहकारी असो, विद्यार्थी असो किंवा साहित्य क्षेत्रातील व्यक्ती—गरज पडल्यास शक्य ते सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती मला अनेकदा अनुभवायला मिळाली.त्यांचा स्पष्टवक्तेपणा काही वेळा ठळकपणे जाणवतो; पण त्या स्पष्टवक्तेपणाच्या मागेही कामाबद्दलची तळमळ आणि माणसांबद्दलची आस्था जाणवत राहते. तुम्हालाच काय पटते की ते.... असे न पटलेल्या बाबी विषयी त्यांचे भाष्य असते.
मारोतराव पाटील कार्लेकरांची मुलाखत
त्यांच्या प्रयोगशील वृत्तीची आठवण सांगताना मारोतराव पाटील कार्लेकर यांच्या मुलाखतीचा प्रसंग विसरता येत नाही. एका यशस्वी उद्योगांची वाटचाल कशी असते हे
विद्यार्थ्यांच्या समोर आलं पाहिजे म्हणून या मुलाखतीचा प्रपंच त्यांनी घडवून आणला होता. केवळ
पुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा संबंधित व्यक्ती, अनुभव आणि वास्तवाशी विद्यार्थ्यांचा थेट संबंध जोडला, तर शिक्षण अधिक जिवंत होतं.
अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात, जिज्ञासा वाढते आणि पुस्तकातील ज्ञानाला अनुभवाची जोड मिळते.
अंबुलगेकर सरांच्या शिक्षकपणातील हा प्रयोगशील धागा मला महत्त्वाचा वाटतो.
साहित्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग
अंबुलगेकर सरांची ओळख केवळ शिक्षक म्हणून करून दिली तर ती अपुरी ठरेल.
साहित्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे.
कविता, लेखन, संपादन, व्याख्यान आणि साहित्यिक चळवळ अशा विविध माध्यमांतून त्यांनी साहित्याशी असलेलं नातं जपलं.
त्यांचा कवितासंग्रह असो किंवा विविध साहित्यिक उपक्रम..त्यांच्या संवेदनशील मनाची प्रचिती त्यातून येते.
‘उद्गार’ साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून त्यांनी साहित्यविश्वात योगदान दिलं. नव्या विचारांना आणि साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.
तसेच ‘मायबोली मराठी परिषदे’चे संस्थापक म्हणून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेलं कार्यही त्यांच्या साहित्यनिष्ठेची साक्ष देतं.
वाणी आणि लेखणी—दोन्हींवर प्रभुत्व
काही माणसं उत्तम लिहितात; पण बोलण्यात तेवढी प्रभावी नसतात. काही उत्तम बोलतात; पण लेखनात ती ताकद दिसत नाही.
अंबुलगेकर सरांकडे मात्र लेखणी आणि वाणी या दोन्ही माध्यमांतून व्यक्त होण्याची क्षमता आहे.
आम्ही आमच्या इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको, नांदेड येथे त्यांना पाचारण केलं होतं मार्गदर्शनासाठी त्यांचे ते सहज मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या मनात खेळत राहिलं.
सूत्रसंचालन करताना प्रसंगाचं भान, भाषेची जाण आणि शब्दांची निवड दिसते. व्याख्यान करताना विषयाचा अभ्यास आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटी जाणवते.
त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि साहित्यिक जाणिवेने अनेक विद्यार्थी आणि श्रोते प्रभावित झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षक
शिक्षकाच्या कामाचं मूल्यमापन केवळ त्याने किती वर्षे नोकरी केली यावर होत नाही.
त्याने किती विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली, किती विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवलं आणि किती विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली—यावर शिक्षकाचं खरं मूल्यमापन होतं.
अंबुलगेकर सर विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत, यामागे त्यांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आणि आपुलकी महत्त्वाची आहे.
वर्षानुवर्षांनंतरही विद्यार्थी शिक्षकाची आठवण काढतात, ही त्या शिक्षकाच्या कार्याची मोठी पावती असते.
कार्याची दखल
त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची विविध स्तरांवर दखल घेतली गेली आहे. मामा वरेरकर शासन पुरस्काराने त्यांचा झालेला सन्मान हा त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव आहे.
पण पुरस्कारापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केलेला विश्वास आणि माणसांच्या मनात मिळवलेलं स्थान.
पदं संपतात.
नोकरीची मुदत संपते.
कार्यालयातील खुर्ची दुसऱ्या व्यक्तीकडे जाते.
पण—
आपण विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात निर्माण केलेलं स्थान निवृत्त होत नाही!
सेवापूर्ती म्हणजे पूर्णविराम नव्हे!
आज अंबुलगेकर सर सेवापूर्तीच्या टप्प्यावर आहेत.
पण मला वाटतं, साहित्यिक माणसाची खरी निवृत्ती कधीच होत नसते.
नोकरीतून सेवापूर्ती होते; विचारातून नाही.
कार्यालयातून सेवापूर्ती होते; लेखणीतून नाही.
नियमित तासिकेतून सेवापूर्ती होते; ज्ञानदानातून नाही.
उलट आता वेळेचं बंधन काही प्रमाणात कमी झाल्यामुळे त्यांच्या अनुभवाला आणि साहित्यिक ऊर्जेला अधिक व्यापक अवकाश मिळू शकतो.
त्यांच्या दीर्घ शिक्षकी जीवनातील अनुभव, साहित्याची समृद्ध शिदोरी आणि समाजप्रबोधनाची तळमळ यांचा उपयोग यापुढेही नव्या पिढीला व्हावा.
त्यांची लेखणी अधिक जोमाने चालावी.
नवीन साहित्यकृती जन्माला याव्यात.
व्याख्यानातून समाजप्रबोधन घडत राहावं.
मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी त्यांचं योगदान आणखी व्यापक व्हावं.
शिवाजीराव, पुढचा प्रवास अधिक समृद्ध होवो!
आपल्या लेखणीतून आणखी सकस साहित्य निर्माण होवो. आपल्या वाणीतून समाजाला दिशा मिळत राहो. विद्यार्थ्यांशी असलेलं आपुलकीचं नातं कायम राहो.
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
YouTube : Hanumant Bhopale
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
संकटात आदेशाची वाट पाहू नका; विवेकाने निर्णय घ्या!
नेपाळच्या मुख्याध्यापकाने दाखवून दिले—समयसूचक निर्णय हजारो जीव वाचवू शकतो!
काही प्रसंग असे असतात की तिथे नियमपुस्तक उघडून बसायला वेळ नसतो. वरिष्ठांचा फोन येईल, आदेश मिळेल, परवानगी मिळेल आणि मग निर्णय घेऊ, एवढा वेळ संकट आपल्याला देत नाही.
अशा वेळी पदावर बसलेल्या माणसाची खरी कसोटी असते.
नेपाळमधील एका मुख्याध्यापकासमोर अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली. आपल्या समयसूचकतेने त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. शाळेत आणि शाळेकडे येणाऱ्या मुलांचा विचार करता तब्बल १,६४३ मुलांना संभाव्य संकटापासून वाचवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे राजेंद्र दवाडी!
नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली खोऱ्यातील Tribhuvan Trishuli Secondary School चे ते मुख्याध्यापक. २६ ऑगस्टच्या सकाळी सुमारे ९.२० वाजता त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली—
वरच्या भागातून भयंकर पूर येतोय!
सुरुवातीला शाळेची तीन मजली काँक्रिटची इमारत सुरक्षित असेल, असे वाटणे स्वाभाविक होते. पण एकामागून एक धोक्याचे इशारे मिळत गेले. नदीचे पाणी प्रचंड वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले.
आता त्यांच्यासमोर प्रश्न होता—
काय करायचं?
अधिकृत आदेशाची वाट पाहायची?
वरिष्ठांना विचारायचं?
आणखी खात्री करून घ्यायची?
की समोर दिसणारा धोका ओळखून विद्यार्थ्यांचा जीव प्रथम वाचवायचा?
दवाडी यांनी निर्णय घेतला—
मुलांचा जीव सर्वांत महत्त्वाचा!
त्यांनी तातडीने घंटा वाजवली. शिक्षकांना विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. शाळेकडे येणाऱ्या बसेसच्या चालकांशी संपर्क साधून त्यांना पुढे न येण्याचा इशारा दिला. शाळेतील विद्यार्थ्यांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली.
वेळ अत्यंत कमी होता.
पण निर्णय योग्य वेळी झाला!
विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर आलेल्या महापुराने शाळेच्या परिसराला मोठा फटका दिला.
वृत्तसंस्थांच्या अहवालांमध्ये आकड्यांची मांडणी थोडी वेगवेगळी आहे. काही वृत्तांत त्या वेळी शाळेत सुमारे ९०० विद्यार्थी असल्याचे नमूद करतात; तर इतर वृत्तांत शाळेत आणि शाळेकडे येत असलेल्या मुलांसह १,६४३ मुलांना संकटापासून वाचवण्यात आले, असे म्हटले आहे.
पण या आकड्यांच्या पलीकडे एक गोष्ट महत्त्वाची आहे—
एका मुख्याध्यापकाने योग्य वेळी घेतलेला निर्णय मोठी जीवितहानी टाळणारा ठरला.
यातून मला आपल्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक फार महत्त्वाचा धडा दिसतो.
संकटात प्रशासकाने काय करावे?
प्रशासक म्हणजे फक्त आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणारा माणूस नव्हे.
त्याच्याकडे विवेक हवा.
परिस्थिती ओळखण्याची क्षमता हवी.
निर्णय घेण्याचे धैर्य हवे.
आणि सर्वांत महत्त्वाचे—माणसाच्या जीवाची किंमत समजणारे मन हवे.
सामान्य परिस्थितीत नियम, प्रक्रिया, परवानगी आणि प्रशासकीय शिस्त अत्यंत आवश्यक आहे. कायदा आणि नियमांशिवाय प्रशासन चालू शकत नाही. त्यामुळे नियम पाळायचे की नाही, हा प्रश्नच नाही. नियम पाळलेच पाहिजेत.
पण खरा प्रश्न वेगळा आहे—
नियम पाळताना विवेक वापरायचा की नियमातील शब्दांवर फक्त बोट ठेवायचं?
यासंदर्भात एक मिस्कील किस्सा सांगितला जातो.
एका कार्यालयात आदेश लावण्यात आला होता—
इथे चप्पल काढून मगच कार्यालयात आले पाहिजे.
एक कर्मचारी एके दिवशी कार्यालयात आला; पण त्या दिवशी त्याच्या पायात चप्पलच नव्हती. तो अनवाणीच आला होता.
सामान्य माणूस काय करेल?
चप्पल नाही म्हणजे सरळ कार्यालयात जाईल!
पण हा कर्मचारी मात्र आदेश शब्दशः पाळणारा!
त्याने आदेश वाचला—
चप्पल काढून मगच कार्यालयात आले पाहिजे.
त्याच्या मनात प्रश्न पडला—
आपल्या पायात चप्पलच नाही, मग काढणार काय?
तो तिथून सरळ घरी परत गेला. घरून चप्पल घेऊन आला. पायात चप्पल घालून कार्यालयाच्या दारापर्यंत आला. ज्या ठिकाणी चप्पल काढण्याचा आदेश लिहिला होता, तिथे चप्पल काढली आणि मग कार्यालयात गेला!
त्याला विचारण्यात आले—
अरे बाबा, तू आधीच अनवाणी आला होतास. मग घरी जाऊन चप्पल घालून आणण्याची काय गरज होती?
त्याने शांतपणे आदेशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला—
इथे काय लिहिलंय ते आधी वाचा आणि मग मला म्हणा!
किस्सा मिस्कील आहे. तो प्रत्यक्ष कुठे घडला यापेक्षा त्यातून मिळणारा बोध महत्त्वाचा आहे.
आदेशाचा उद्देश काय होता?
कार्यालयात चप्पल घालून येऊ नये.
पण त्या कर्मचाऱ्याने आदेशाचा उद्देश समजून घेतला नाही; त्याने फक्त शब्द पकडले!
प्रशासनातही कधी कधी असेच घडते.
वरून आदेश आला की त्यामागचा उद्देश काय आहे, तो कोणत्या परिस्थितीसाठी आहे, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि त्याची अंमलबजावणी करताना कोणता विवेक वापरायला हवा, याचा विचार करण्याऐवजी काही जण केवळ आदेशातील शब्दांवर बोट ठेवतात.
आणि मग एक वाक्य तयार असते—
आदेशात तसंच लिहिलं आहे!
प्रशासनाने दिलेला आदेश आपल्या सोयीने बदलायचा, नियम मोडायचे किंवा मनमानी करायची, असा याचा अर्थ अजिबात नाही.
कायद्याचा सन्मान आणि विवेकाचा वापर हे एकमेकांचे विरोधक नाहीत.
उलट चांगल्या प्रशासनासाठी दोन्ही आवश्यक आहेत.
नियमाचा हेतू समजला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. आणि विशेषतः जीविताचा प्रश्न असेल तर उपलब्ध अधिकारांच्या आणि कायदेशीर चौकटीच्या मर्यादेत तातडीने निर्णय घेण्याची क्षमता प्रशासकाकडे असली पाहिजे.
कारण संकट कधी कधी तुम्हाला फाईल हलवण्याइतकाही वेळ देत नाही!
त्या वेळी तुमच्या हातात असते ती—
तुमची बुद्धी,
तुमचा विवेक,
तुमची समयसूचकता
आणि निर्णय घेण्याचे धैर्य!
कल्पना करा, राजेंद्र दवाडी यांनी म्हटले असते—
मला अजून अधिकृत आदेश मिळालेला नाही.
वरिष्ठांना विचारल्याशिवाय शाळा रिकामी करता येणार नाही.
थोडं थांबू या, पूर खरंच इकडे येतो का ते पाहू.
तर?
त्या काही मिनिटांची किंमत किती मोठी ठरली असती, याची कल्पनाही करवत नाही.
नियम माणसासाठी आहेत; माणूस नियमासाठी नाही, असे जे म्हटले जाते, त्याचा मतितार्थ अशा प्रसंगी किती सार्थ आहे, हे लक्षात येते.
याचा अर्थ नियम तोडा असा अजिबात नाही.
नियमांचा उद्देश समजून घ्या.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.
जीवितरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या.
आणि आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध माहितीच्या आधारे विवेकपूर्ण निर्णय घ्या.
निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा—
मी हा निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम काय होतील?
कारण कधी कधी निर्णय घेण्यापेक्षा निर्णय न घेण्याची किंमत अधिक मोठी असते.
राजेंद्र दवाडी यांची ही सत्यघटना केवळ एका शिक्षकाच्या शौर्याची कथा नाही.
ती प्रत्येक प्रशासकासाठी, मुख्याध्यापकासाठी, प्राचार्यासाठी, अधिकाऱ्यासाठी आणि व्यवस्थापकासाठी उद्बोधक आहे.
ती जबाबदारीच्या पदावर बसलेल्या प्रत्येक माणसाला एक प्रश्न विचारते—
संकट अचानक तुमच्या दारात आले तर तुम्ही आदेशाची वाट पाहणार, की परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विवेकाने निर्णय घेणार?
पद तुम्हाला अधिकार देते; पण संकटाच्या वेळी घेतलेला योग्य निर्णयच तुमची खरी ओळख निर्माण करतो.
संकट समोर उभे राहिल्यानंतर फक्त एवढे म्हणून चालत नाही—
मला आदेश नव्हता!
कधीकधी इतिहास तुम्हाला विचारतो—
तुमच्याकडे विवेक होता ना? मग तुम्ही निर्णय का घेतला नाही?
म्हणून संकटात घाबरू नका.
परिस्थिती समजून घ्या.
उपलब्ध माहिती तपासा.
माणसाचा जीव केंद्रस्थानी ठेवा.
आणि वेळेत विवेकपूर्ण निर्णय घ्या!
कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय हजारो आयुष्यांचे भविष्य वाचवू शकतो.
नेपाळचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
प्रशासकीय व्यवस्था कितीही नियमबद्ध असली, आदेश आणि परवानग्यांची साखळी कितीही कडक असली, तरी प्रत्यक्ष संकटाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या जबाबदार व्यक्तीचे धाडस, विवेक आणि समयसूचकता यांना अनन्यसाधारण महत्त्व असते.
राजेंद्र दवाडी यांनी आदेशाची वाट पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. म्हणून त्यांच्या निर्णयाचे आणि धाडसाचे कौतुक झालेच पाहिजे.
शेवटी एवढंच—
नियम पाळा; पण नियमामागचा उद्देशही समजून घ्या.
कायद्याचा आदर करा; पण विवेकाला बाजूला ठेवू नका.
आदेशाचे पालन करा; पण आपत्कालीन परिस्थितीत निर्णयक्षमतेला कुलूप लावू नका.
कारण—
कायद्यावर बोट असावे; पण विवेकावर कुलूप नसावे!
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
YouTube : Hanumant Bhopale
2 weeks ago | [YT] | 0
View 1 reply
Hanumant Bhopale
विद्यार्थ्यांना शिकवण्याआधी त्यांना समजून घ्या!
ज्ञानाची पेरणी करण्यापूर्वी मनाची मशागत झाली पाहिजे
— प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे
आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याअगोदर त्यांना समजून घेणे अतिशय गरजेचे आहे.
केवळ अभ्यासक्रम शिकवणे, परीक्षा घेणे आणि गुण देणे एवढीच शिक्षकाची जबाबदारी नाही. शिक्षकाच्या हातात पुस्तक असतं; पण त्याच्यासमोर बसलेला विद्यार्थी म्हणजे केवळ अभ्यासक्रम शिकणारा मेंदू नसतो. तो भावना, विचार, संस्कार, अनुभव, स्वप्नं, भीती, अपेक्षा, कौटुंबिक परिस्थिती आणि अनेक न दिसणारे संघर्ष घेऊन वर्गात आलेला एक माणूस असतो.
म्हणून विद्यार्थ्याच्या बुद्धीपर्यंत पोहोचण्याअगोदर त्याच्या मनापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.
ज्ञानाची पेरणी करण्यापूर्वी मनाची मशागत करा
शेतकरी थेट शेतात बी पेरत नाही.
अगोदर तो जमिनीची मशागत करतो. नांगरणी करतो. ढेकळं फोडतो. जमीन पेरणीयोग्य बनवतो आणि मग योग्य वेळी पेरणी करतो.
जमीनच तयार नसेल, तर कितीही उत्तम दर्जाचं बी टाकलं तरी अपेक्षित पीक येईलच याची खात्री देता येत नाही.
शिक्षकाचंही अगदी तसंच आहे.
ज्ञानाची पेरणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत केली पाहिजे.
विद्यार्थ्याचं मन कसं आहे? त्याच्या भावना काय आहेत? त्याच्या मनात कोणते विचार सुरू आहेत? त्याच्यावर कोणते संस्कार झाले आहेत? त्याची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे? तो सध्या कोणत्या मनःस्थितीत आहे? त्याच्या आयुष्यात काही संघर्ष सुरू आहे का?
हे समजून घेतल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचणार कसे?
यंत्र चालवायचं असेल तरी अगोदर ते यंत्र समजून घ्यावं लागतं. मग माणूस घडवायचा असेल तर त्याचं मन समजून न घेता कसं चालेल?
दिसणाऱ्या परिस्थितीवर बोलण्यापूर्वी न दिसणारी मनःस्थिती समजून घ्या
हा मुद्दा शिक्षकांसाठी फार महत्त्वाचा आहे.
आपण विद्यार्थ्याकडे पाहतो आणि काही क्षणांत त्याच्याबद्दल मत तयार करतो.
“हा आळशी आहे.”
“हा उद्धट आहे.”
“हिला अभ्यासात रस नाही.”
“हा मुद्दाम गैरहजर राहतो.”
“याला शिस्तच नाही.”
“याच्याकडून काही होणार नाही.”
पण आपल्याला दिसतं ते संपूर्ण सत्य असतंच असं नाही.
प्रथमदर्शनी दिसणारी परिस्थिती ही हिमनगाच्या टोकासारखी असते.
वर थोडंसं दिसतं; पण त्याखाली खूप काही दडलेलं असतं.
विद्यार्थ्याच्या दिसणाऱ्या वर्तनाखाली त्याच्या भावना, वेदना, भीती, अपमान, अपयश, कौटुंबिक संघर्ष, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील प्रश्न, न्यूनगंड किंवा आत्मविश्वासाचा अभाव दडलेला असू शकतो.
म्हणूनच—
वर्तन दिसतं; पण वर्तनामागची वेदना दिसत नाही!
एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही असं आपल्याला दिसतं.
आपण सहज म्हणतो—
“आळशी आहे!”
पण त्याच्या घरात अभ्यासासाठी वातावरण आहे का?
त्याच्या घरात सतत भांडणं सुरू आहेत का?
त्याच्यावर कामाची किंवा कुटुंबाची जबाबदारी आहे का?
त्याला विषय समजतोय का?
त्याला अपयशाची भीती वाटतेय का?
त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे का?
त्याला कुणीतरी अपमानित केलं आहे का?
त्याला प्रोत्साहन देणारं कोणी आहे का?
हे प्रश्न आपण कितीदा विचारतो?
प्रत्येक प्रतिक्रियेला एक पार्श्वभूमी असते
एखादा विद्यार्थी छोट्याशा गोष्टीवर खूप रागावतो.
आपण म्हणतो—
“एवढ्या छोट्या गोष्टीवर एवढा राग?”
पण ती गोष्ट आपल्यासाठी छोटी असते. त्याच्यासाठी ती एखाद्या जुन्या जखमेची आठवण असू शकते.
काही विद्यार्थी दुःखातही हसतात.
काही तणावात असतानाही शांत दिसतात.
काही जण रागाच्या आड भीती लपवतात.
काही कठोरपणाच्या आड असुरक्षितता लपवतात.
आणि काहींचा अबोला हा अहंकार नसतो; तो एखाद्या खोल जखमेची प्रतिक्रिया असू शकतो.
म्हणून विद्यार्थ्याच्या आजच्या प्रतिक्रियेवरून त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व ठरवू नये.
वर्तनाच्या मागे भावना असतात आणि भावनांच्या मागे अनुभव असतात.
निष्कर्षापेक्षा प्रश्न महत्त्वाचे
शिक्षकाने निकाल देण्याची घाई करू नये.
“तू चुकीचा आहेस.”
“तुला शिस्त नाही.”
“तू अभ्यास करत नाहीस.”
“तुझं काही होणार नाही.”
असं म्हणण्यापेक्षा प्रश्न विचारा—
“तू असा का वागतो आहेस?”
“तुझ्या मनात काही चाललंय का?”
“घरी सगळं ठीक आहे ना?”
“काही अडचण आहे का?”
“तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का?”
कदाचित या पाच प्रश्नांतून एखाद्या विद्यार्थ्याच्या मनाचं बंद दार उघडू शकतं.
निष्कर्ष माणसाला बंद करू शकतो; प्रश्न त्याला बोलतं करू शकतो.
ऐकणं ही समजून घेण्याची पहिली पायरी
विद्यार्थ्याची न दिसणारी मनःस्थिती समजून घ्यायची असेल, तर त्याला बोलू दिलं पाहिजे.
तो बोलत असताना मध्येच उपदेश करू नका.
प्रत्येक वाक्यावर निर्णय देऊ नका.
त्याची तुलना दुसऱ्या विद्यार्थ्याशी करू नका.
पहिल्यांदा त्याला पूर्ण बोलू द्या.
कारण काही वेळा विद्यार्थ्याला उत्तर नको असतं; त्याला फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं असं वाटत असतं.
ऐकलं जाणं हेही एक प्रकारचं भावनिक औषध आहे.
जेव्हा विद्यार्थ्याला वाटतं—
“माझं कुणीतरी ऐकतंय… मला कुणीतरी समजून घेतंय…”
तेव्हा तो मन उघडायला लागतो.
आणि मन उघडलं की न दिसणारी परिस्थिती हळूहळू दिसायला लागते.
विद्यार्थ्याच्या मौनालाही ऐका
काही विद्यार्थी बोलून सांगतात; काही शांत राहून सांगतात.
शांतताही बोलत असते.
अचानक कमी बोलणं, मित्रांपासून दूर राहणं, वारंवार गैरहजर राहणं, सतत थकलेलं दिसणं, अचानक चिडचिड वाढणं, अभ्यासातील कामगिरी घसरणं किंवा पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणं—अशा बदलांकडे संवेदनशीलतेने पाहायला हवं.
प्रत्येक बदल म्हणजे मानसिक आजार असतो असं नाही. पण असा बदल सातत्याने जाणवत असेल, तर विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचं ते एक कारण नक्कीच आहे.
विद्यार्थी म्हणजे त्याची एक चूक नव्हे
एखादा विद्यार्थी एकदा नापास झाला म्हणून तो अपयशी माणूस होत नाही.
एखाद्या विद्यार्थ्याकडून चूक झाली म्हणून तोच चुकीचा आहे, असंही नाही.
एखादा विद्यार्थी एका प्रसंगी रागावला म्हणून त्याचा स्वभावच खराब आहे, असा शिक्का मारणं योग्य नाही.
व्यक्ती आणि तिचं वर्तन यात फरक केला पाहिजे.
वर्तन सुधारता येतं.
चूक दुरुस्त करता येते.
पण विद्यार्थ्यालाच सतत “तू वाईट आहेस”, “तुझं काही होणार नाही” असं सांगितलं, तर त्याचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास दुखावू शकतो.
सहानुभूती म्हणजे चुकीचं समर्थन नाही
विद्यार्थ्याला समजून घेणं म्हणजे त्याच्या प्रत्येक चुकीचं समर्थन करणं नव्हे.
शिस्त आवश्यक आहे.
चुकीचं वर्तन थांबवणं आवश्यक आहे.
जबाबदारीची जाणीव करून देणंही आवश्यक आहे.
पण चूक दुरुस्त करताना माणूस मोडता कामा नये.
शिक्षकाने चुकीला चूक म्हणावी; पण त्या चुकीमागचं कारणही समजून घ्यावं.
समजून घेणं आणि समर्थन करणं यात फरक आहे.
पहिल्यांदा विद्यार्थ्याला ‘स्वस्थ’ करा
‘स्वस्थ’ या शब्दाकडे मला एका वेगळ्या अर्थाने पाहावंसं वाटतं—
स्व + स्थित = स्वस्थ!
म्हणजे स्वतःमध्ये स्थित असणं. स्वतःसोबत असणं. वर्तमानात असणं.
विद्यार्थी स्वतःसोबतच नसेल, त्याचं मन भूतकाळातील वेदनेत अडकलं असेल किंवा भविष्याच्या भीतीने अस्वस्थ असेल, तर शिक्षक देत असलेलं ज्ञान तो ग्रहण करणार कसं?
एखादा माणूस चालायलाच सक्षम नसेल आणि आपण त्याला मॅरेथॉनमध्ये धावायला सांगितलं, तर ते जितकं अव्यवहार्य आहे, तितकंच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, तणावग्रस्त आणि आत्मविश्वास गमावलेल्या विद्यार्थ्याकडून थेट मेरिटची अपेक्षा करणं अव्यवहार्य ठरू शकतं.
शिक्षकाच्या शब्दाला धार नव्हे, आधारही हवा!
चक्रधर स्वामी यांनी “अपेक्षा प्रेम उत्तम” असे सांगून प्रेमाची महती अधोरेखित केली आहे.
या विचाराचा मतितार्थ शिक्षणाच्या संदर्भातही समजून घेतला पाहिजे.
विद्यार्थ्याला पहिल्यांदा प्रेम दिलं पाहिजे.
त्याला समजून घेतलं पाहिजे.
त्याला धीर दिला पाहिजे.
त्याला आधार दिला पाहिजे.
कारण—
शिक्षकाच्या शब्दाला केवळ धार असून चालणार नाही; त्याच्या शब्दाला आधारही असला पाहिजे!
धार असलेला शब्द विद्यार्थ्याला शिस्त लावू शकतो; पण आधार असलेला शब्द त्याला पुन्हा उभं करू शकतो.
शिक्षकाचं बोलणं ऐकून विद्यार्थ्याला धीर आला पाहिजे. तो मनाने खंबीर झाला पाहिजे. त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्याच्यातला उत्साह जागा झाला पाहिजे.
त्याच्या मनात भावना निर्माण झाली पाहिजे—
“माझ्यासोबत कोणीतरी आहे.
मी एकटा नाही.
माझं मन समजून घेणारं कोणीतरी आहे.”
ही भावना निर्माण झाली की विद्यार्थी शिक्षकासोबत भावनिकदृष्ट्या जोडला जातो.
आणि जेव्हा विद्यार्थी शिक्षकाच्या मनाशी जोडला जातो, तेव्हा शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाशीही जोडला जाण्याची शक्यता वाढते.
म्हणून विद्यार्थ्याच्या डोक्यापर्यंत पोहोचण्याची घाई करण्यापूर्वी त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
संकटाच्या क्षणी शिक्षकाचा चेहरा आठवला पाहिजे
विद्यार्थ्याला एखादा गंभीर मानसिक प्रश्न सतावत असेल, तो प्रचंड तणावात किंवा निराशेत असेल आणि एखाद्या क्षणी त्याला वाटलं—
“आता काहीच उरलं नाही…
मला कोणी समजून घेणार नाही…”
तर त्या कठीण क्षणी त्याला आपल्या शिक्षकाचा चेहरा आठवला पाहिजे.
त्याच्या मनातून आवाज आला पाहिजे—
“नाही! माझे सर आहेत… माझ्या मॅडम आहेत… ते मला समजून घेतील. मी त्यांच्याकडे जाऊ शकतो.”
आणि तो स्वतःहून शिक्षकाकडे आला पाहिजे.
कदाचित त्याला त्या क्षणी मोठं भाषण नको असेल.
त्याची एवढीच अपेक्षा असेल—
“सर, माझ्या पाठीवर हात ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा— लढ! तू यातून बाहेर पडू शकतोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत.”
तो आपलं मन हलकं करेल.
त्याच्या मनातलं बोलून दाखवेल.
आणि आवश्यक असेल तर शिक्षक त्याला प्रशिक्षित समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडे योग्य मदतीसाठी घेऊन जाईल.
शिक्षकाने प्रत्येक मानसिक प्रश्न स्वतः सोडवायचा नसतो.
पण विद्यार्थ्याला योग्य मदतीपर्यंत पोहोचवणारा विश्वासाचा पूल शिक्षक नक्कीच बनू शकतो.
शिक्षणातील खरी क्रांती
शिक्षणातील क्रांती म्हणजे केवळ नवीन अभ्यासक्रम, स्मार्ट बोर्ड, डिजिटल क्लासरूम, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा नवीन तंत्रज्ञान नव्हे.
या सर्वांची आवश्यकता आहेच.
पण त्याबरोबर—
विद्यार्थ्याचं मन ओळखणारा शिक्षक,
त्याच्या वर्तनामागची वेदना समजून घेणारा शिक्षक,
त्याचं मौन ऐकणारा शिक्षक,
त्याला बोलतं करणारा शिक्षक,
खचल्यावर पाठीवर हात ठेवणारा शिक्षक
आणि गरजेच्या वेळी योग्य मदतीकडे नेणारा शिक्षक निर्माण होणं हीसुद्धा शिक्षण क्षेत्रातील मोठी क्रांती आहे.
म्हणून—
अभ्यासक्रम शिकवण्याआधी विद्यार्थी समजून घ्या.
गुण विचारण्याआधी त्याचं मन विचारा.
चूक दाखवण्याआधी तिचं कारण शोधा.
निष्कर्ष काढण्याआधी प्रश्न विचारा.
उपदेश करण्याआधी त्याचं ऐका.
दिसणाऱ्या परिस्थितीवर बोलण्यापूर्वी न दिसणारी मनःस्थिती समजून घ्या.
कारण—
जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं;
आणि जे दिसत नाही, त्यातच अनेकदा विद्यार्थ्याच्या वर्तनाचं खरं उत्तर दडलेलं असतं.
शिक्षकाच्या शब्दाला केवळ धार नको—आधारही हवा!
विद्यार्थ्याला केवळ शिकवणारा शिक्षक नको—त्याला समजून घेणारा शिक्षक हवा!
आणि असे शिक्षक निर्माण झाले, तर आपली शिक्षणव्यवस्था केवळ गुणवान विद्यार्थी घडवणार नाही; ती मनाने खंबीर, आत्मविश्वासपूर्ण आणि जीवनावर प्रेम करणारी माणसं घडवेल.
हीच शिक्षण क्षेत्रातील खरी क्रांती ठरेल!
— प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
उद्याच्या भविष्यासाठी उदासीनतेची जळमटं दूर करा!
डॉ. हनुमंत भोपाळे
काल अचानक एक जण भेटला.
वर्गमित्र नव्हता, एका महाविद्यालयात होतो.
संवाद, संपर्क नव्हता फक्त हायबाय इतकेच चालायचे..
तो सामाजिक कार्यात खूप सक्रिय असायचा. वेगवेगळ्या विधायक उपक्रमात सकारात्मक असायचा... चांगले लिहायचा, सकारात्मक बोलायचा. कुणाला मदत लागली तर सहकार्यासाठी सदैव सज्ज असायचा. आपलेपणा तर त्याच्या रोमारोमात भरलेला होता.
त्याच्या सहवासात गेलं की आपल्यालाही उत्साह वाटायचा.
पण कालचा तो मला वेगळाच दिसला… मनात कसे तरी
झाले.
खांदे पाडून चालत होता. चेहरा पडलेला होता. नेहमीच्या चेहऱ्यावरचा उत्साह कुठेतरी हरवलेला दिसत होता.
मी सहज विचारलं,
“मजेत ना भाऊ?”
तो थोडा थांबला आणि म्हणाला,
“कशातच मजा वाटत नाही रे भाऊ! बेरोजगारीने जसं घेरलं बघ, तसं बेकार विचारांनीही घेरलंय. माझ्यासाठी एक छान प्रेरणादायी लेख लिह बरं. माझ्या मनात पुन्हा एकदा उत्साह येऊ दे! मी तुझ्या लेखाची वाट पाहतो…
” जरा घाई आहे
तुझा मोबाईल नंबर दे.
मी मोबाईल नंबर दिला.
मी मात्र मोबाईल नंबर घ्यायचे विसरलो..
तो निघून गेला डोळ्यांसमोरून पण
पण त्याचे शब्द मात्र माझ्या मनात घोळत राहिले.
रात्री मला ते शब्द अस्वस्थ करीत होते
मनात विचार येत होते
असे कितीतरी भाऊ असतील…
कितीतरी बहिणी असतील…
कुणाला बेरोजगारीने घेरलं असेल.
कुणाला अपयशाने.
कुणाला आर्थिक अडचणींनी.
कुणाला नात्यांमधील अपेक्षाभंगाने.
कुणाला एकटेपणाने.
कुणाला लोकांच्या बोलण्याने.
तर कुणाला स्वतःच्या नकारात्मक विचारांनी.
त्यांच्यासाठी लिहिले पाहिजे...
आपण लहानपणापासून प्रतिज्ञेत म्हणत आलो आहोत
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
मग आपल्या एखाद्या बांधवाचे खांदे निराशेने खाली गेले असतील, तर त्याच्या खांद्यावर हात ठेवणं ही आपली जबाबदारी नाही का?
मेल्यावर फक्त खांदाच द्यायला वेळ नसतो..अनेकांना
आधार द्यायला नसतील पण
खांदा द्यायला असतात अनेक..
आपण
फक्त भावपूर्ण श्रद्धांजली ऐवढेच लिहून
आपली सामाजिकदायित्व संपवून टाकायचं का?
यालाच म्हणायचं का, सामाजिक बांधिलकी
सामाजिक कार्य
राष्ट्रीय कर्तव्य!
आपल्या देशबांधवांच्या
मनातील निराशेच्या अंधारात आशेचा छोटासा दिवा लावता आला पाहिजे.
कुणाचं संपूर्ण आयुष्य बदलता आलं नाही, तरी त्याचा आजचा दिवस थोडा आशादायी करता आला, तरी तेही महत्त्वाचं आहे.
याच भावनेतून त्या भेटलेल्याच नाही तर
निराशेच्या वळणावर उभ्या असलेल्या माझ्या तमाम भावा-बहिणींसाठी हा लेख…
भाऊ, तुझा उत्साह आणि आत्मविश्वास कुठे ठेवलास?
भाऊ, जरा स्वतःलाच विचार…
तुझा तो उत्साह कुठे गेला?
तुझा तो आत्मविश्वास कुठे ठेवलास?
एक काळ होता…
तुझ्या बोलण्यात एक वेगळीच आग होती. ऐकणाऱ्यांना जाग येत होती. बसलेला उठायचा,उठलेला चालायचा, चालणारा पळायचा!
तुझ्या डोळ्यांत मोठी स्वप्नं होती. मनात प्रचंड उत्साह होता.
आत्मविश्वास होता.
तेव्हा तू किती आत्मविश्वासाने म्हणायचास
“लाथ मारेन तिथे पाणी काढेन!”
“असाध्य ते साध्य करीनच!”
“रडत बसायचं नसतं; लढत राहायचं असतं!”
“खचून जायचं नसतं; यश खेचून आणायचं असतं!”
काय जबरदस्त आत्मविश्वास होता रे तुझा!
अडचण आली की तू घाबरत नव्हतास. उलट अडचणीला आव्हान समजून भिडायचास.
तू म्हणायचास,
“मला थांबवणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे!”
कुणी तुझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला तर तू म्हणायचास,
“मला अडवण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याच्यावरून उडी मारून पुढे जाईन!”
ती उडी कुठे गेली.. मनात कोण कोणत्या आड्या
आल्या?
तुझं आणखी एक वाक्य असायचं,
“मला अस्वस्थ करणा-या शब्दाचा अजून जन्म व्हायचा आहे!”
आज ते शब्द जन्मलेत का?
का जन्मू दिलास?
मारणाऱ्या शब्दांना मारून टाकायचं बेट्या
तारणाऱ्या शब्दांना मनात वावरू द्यायचं असते.
म्हणजे आपली जीवननौका सहजच तरून जाईल.
आपल्याला मनानं चीरतरुण ठेवील..
तुझा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता!
मग भाऊ…
आज काय झालं तुला?
कुठे ठेवलीस ती जिद्द?
कुठे ठेवला तो उत्साह?
कुठे ठेवला तो दुर्दम्य आत्मविश्वास?
कुणी चोरलं का रे हे सगळं तुझं!
का चोरू दिले?
दुसऱ्यांच्या डोळ्यांत स्वतःला शोधू नकोस
तूच तर म्हणायचास,
“कुणाच्या डोळ्यांत आपण काय आहोत, याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या डोळ्यांत आपण ‘बेस्ट’ असलं पाहिजे. प्रत्येक दिवशी आपलं ‘बेस्ट’ करत वाटचाल केली पाहिजे.”
मग ते मग तशी वाटचाल कर ना कुणी अडवलं?
तूच तुला अडवतोस बेट्या!
तू,' वाघाचे पिल्लू आहेस मांजरीचं नाही हे लक्षात ठेव'!
प्रत्येकाच्या डोळ्यांत आपली प्रतिमा सारखी असणार नाही.
कुणाला आपण चांगले वाटू.
कुणाला वाईट वाटू.
कुणी कौतुक करेल.
कुणी टीका करेल.
कुणाला आपली प्रगती आवडेल.
तर कुणाला ती खटकेल.
प्रत्येकाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करत बसलो, तर स्वतःचं आयुष्य जगायला वेळ कधी मिळणार?
लोकांच्या डोळ्यांत आपण काय आहोत, यापेक्षा आपल्या स्वतःच्या डोळ्यांत आपण काय आहोत, हे अधिक महत्त्वाचं!
कोणाचे टीकेने अस्वस्थ होत असशील तर एक वाक्य लक्षात ठेव एक होता कार्व्हर या पुस्तकातील त्या कार्व्हरच..
तुम्ही टिकेल का उत्तर देत नाही असं जेव्हा त्याला विचारायचं तेव्हा तो म्हणायचा, "मी तेच करत बसलो तर माझं जीवितकार्य तसेच राहून जाईल!
सचिन तेंडुलकरांचे वाक्य लक्षात ठेव..
कमी रन काढले की, त्यांच्यावर टीका व्हायची तेव्हा ते म्हणायचे,
"माझी बॅटच त्यांना उत्तर देईल"
अरे भाऊ…
तुझ्याविषयी कुणी काही आलतू-फालतू बोललं आणि ते तुला सांगायला कुणी आलं, तर तू त्यालाच म्हणायचास,
“कचरा देवघरात आणायचा नसतो; कचऱ्याची जागा कचरापेटीत असते!”
मग आज काय झालं?
पूर्वी दुसऱ्यांची नकारात्मकता मनापर्यंत पोहोचू देत नव्हतास आणि आज मात्र तूच नकारात्मक विचारांनी स्वतःचं मन भरून घेतोयस!
आज नकारात्मक विचार करून तू स्वतःचाच कचरा करून घेतोयस, असं तुला वाटत नाही का?
कुणी काय बोललं…
कुणी आपल्याला काय समजलं…
कुणी आपली किंमत केली नाही…
कुणी पाठीमागे टीका केली…
हे पुन्हा पुन्हा मनात घोळवत बसल्याने नुकसान त्या बोलणाऱ्याचं होत नाही.
नुकसान तुझ्या मनःशांतीचं होतं! तुझं होतं.
म्हणून तुझ्या मनाला देवघरासारखं जप.
तू काय प्रहार करायला ही तयार असतात आणि यशस्वी झाले की पुष्पहार घेऊन तेच पुढे असतात.
तू मनात चांगले विचार ठेव.
ध्येय ठेव.
जिद्द ठेव.
प्रेम ठेव.
कृतज्ञता ठेव.
आत्मविश्वास ठेव.
पण कुणीतरी फेकलेले टोमणे, द्वेष, अपमान आणि नकारात्मकता मनाच्या देवघरात आणून ठेवू नकोस.
तू,बेरोजगार असशील; पण बेकार नाहीस!
आणि भाऊ, तू मला म्हणालास,
“बेरोजगारीने जसं घेरलं, तसं बेकार विचारांनीही घेरलंय.”
एक गोष्ट लक्षात ठेव.
तू आज बेरोजगार असू शकतोस; पण म्हणून तू बेकार ठरत नाहीस!
नोकरी नसणं ही आजची परिस्थिती असू शकते; ती तुझी कायमची ओळख नाही.
तुझं शिक्षण, तुझी कौशल्यं, तुझा अनुभव, तुझी माणुसकी, तुझी मेहनत करण्याची तयारी आणि तुझ्यातली शिकण्याची क्षमता—यांची किंमत एका नियुक्तिपत्रावर ठरत नाही.
काम शोध.
नवं कौशल्य शिक.
छोट्या संधीला कमी लेखू नकोस.
गरज पडली तर नव्याने सुरुवात कर.
पण स्वतःलाच ‘बेकार’ ठरवू नकोस.
परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो; पण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आजपासून सुरू करता येतो.
एका अपयशाने आयुष्य संपत नाही.
एक वाट बंद झाली म्हणजे जगातल्या सगळ्याच वाटा बंद झाल्यात असं नाही.
नोकरी हाच काही एकमेव पर्याय नाही उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे अनेक संधी आहे त्या शोध.
एक लढाई हरलास म्हणजे संपूर्ण युद्ध हरलास असं नसतं.
एका परीक्षेत अपयश आलं म्हणून आयुष्य संपत नाही.
एका नात्यात अपेक्षाभंग झाला म्हणून सगळी माणसं वाईट नसतात.
एखाद्याने तुला नाकारलं म्हणून तुझी किंमत कमी होत नाही.
लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल; पण तू स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस!
जरा मागे वळून बघ.
आजपर्यंत कितीतरी संकटं पार करून तू इथपर्यंत आला आहेस.
कधीतरी तुला वाटलं होतं—
“आता आपल्याकडून होणार नाही…”
पण झालं ना?
तू त्यातून बाहेर आलास ना?
मग आताही येशील!
उत्साह येण्याची वाट पाहू नकोस
“मूड आला की काम करेन.”
“योग्य वेळ आली की काम सुरू करेन.”
असं म्हणत बसू नकोस.
कधी कधी उत्साह आधी येत नाही.
आपण कामाला लागतो आणि मग उत्साह हळूहळू परत येतो.
अभ्यास करायचा आहे?
एक पान वाच.
व्यायाम करायचा आहे?
दहा मिनिटं चाल.
पुस्तक लिहायचं आहे?
आज दहा ओळी लिही.
नोकरी शोधायची आहे?
आज एक अर्ज कर.
नवं कौशल्य शिकायचं आहे?
आज पहिला धडा सुरू कर.
ध्येय मोठं आहे?
असू दे!
आजचं पाऊल छोटं असलं तरी चालेल; पण ते पुढे पडलं पाहिजे.
आता स्वतःलाच पुन्हा सांग…
भाऊ…
एकदा आरशासमोर उभा राहा.
स्वतःच्या डोळ्यांत बघ.
आणि एकेकाळी तू जगाला सांगत असलेली वाक्यं आता स्वतःच्या मनाला सांग—
“खचून जायचं नसतं; यश खेचून आणायचं असतं!”
“रडत बसायचं नसतं; लढत राहायचं असतं!”
“असाध्य ते साध्य करीनच!”
“अडथळा आला म्हणून थांबायचं नसतं; त्यावरून उडी मारून पुढे जायचं असतं!”
“आपल्या दिशेने फेकलेल्या दगडांची जखम कुरवाळत बसायचं नसतं; त्याच दगडांची यशाची पायरी बांधायची असते!”
आणि स्वतःला सांग—
मी संपलेलो नाही.
मी फक्त थोडा थकलो आहे.
मी हरलेलो नाही.
मी एका कठीण टप्प्यातून जात आहे.
मी पुन्हा उभा राहीन.
मी पुन्हा प्रयत्न करीन.
मी पुन्हा लढेन.
आणि पुन्हा पुढे जाईन!”
भाऊ…
तुझा उत्साह कुठेही हरवलेला नाही.
तुझा आत्मविश्वास कुणी चोरलेला नाही.
तुझ्यातली आग विझलेली नाही.
तो जुना जिद्दीचा माणूस अजूनही तुझ्यातच आहे!
त्याला पुन्हा हाक मार.
त्याला जागं कर.
उदासीनतेची जळमटं दूर कर.
नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर फेक.
लोकांनी फेकलेल्या दगडांच्या पायऱ्या बांध.
आणि पुन्हा चालायला सुरुवात कर.
वेग कमी असला तरी चालेल.
पाऊल छोटं असलं तरी चालेल.
मध्ये थकलास तर थोडी विश्रांती घे.
पण स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही!
आणि निराशा इतकी वाढली की रोजच्या जगण्यात रस उरला नाही, झोप-भूक बिघडली किंवा स्वतःला इजा करण्याचे विचार येऊ लागले, तर हे एकट्याने सहन करत बसू नकोस. विश्वासू माणसाशी बोल आणि मानसिक आरोग्यतज्ज्ञाची मदत घे. मदत मागणं ही कमजोरी नाही; स्वतःला सावरण्यासाठी उचललेलं शहाणपणाचं पाऊल आहे.
कारण
तुझ्या आयुष्याचा शेवटचा अध्याय अजून लिहिलेला नाही.
कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात यशस्वी आणि सर्वात प्रेरणादायी अध्याय—
अजून लिहायचाच बाकी आहे!
लेखक : प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
📱 मोबाईल : 9767704604
📧 ई-मेल : hanumantbhopale@gmail.com
▶️ YouTube : Hanumant Bhopale
2 weeks ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Load more